इंडिया! इंडिया !! इंडिया !!!



------------------------------------------------------------------

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी जवळ आले कि एक पोस्ट सोशल मीडियावर वायरल होत असते कि भारताला इंग्रजी मध्ये INDIA असे का म्हणतात ? त्याचे कारण असे सांगितले जाते की ;

I - Independent  N- Nation D- Declared  I - In A- August

आणि  वरून असेही सांगितले जाते कि INDIA हे नाव स्वा. सावरकरांनी सुचवलेले आहे.

आमची सुज्ञ भारतीयांना नम्र विनंती आहे कि असल्या भंपक आणि तद्दम खोटारड्या पोस्टवर आजिबात विश्वास ठेवू नका. 

मुळात ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य मिळालेला भारत हा एकमेव देश नाही. भारताप्रमाणे, पाकिस्तान, कोरिया, काँगो असेही देश ऑगस्ट मध्येच स्वतंत्र झाले होते.

तसेच इंडिया हा शब्द किमान २०० वर्षे जुना आहे, १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी देखील हा शब्द अस्तित्वात होता. १८५७ च्या उठावावेळीची एक प्रसिद्ध घोषणा होती " खुल्क खुदा का, मुल्क बादशाह का, अमल कुंपणी सरकारका " या मधले कुंपणी सरकार म्हणजे " ईस्ट इंडिया कंपनी " चे सरकार होय.

महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेला (१९४२) इंग्रजी मध्ये " इंडियन नॅशनल आर्मी " असेच म्हटले जायचे. या फौजेतील सैनिकांच्या गणवेशावर ' INA ' असे छापलेले बिल्ले असत.

गांधीजींनी १९१९ ते १९३१ पर्यंत चालवलेल्या साप्ताहिकाचे नांव " यंग इंडिया ' असेच होते.

वरील सर्व नावामध्ये इंडिया हा शब्द वापरलेला आहे तथापि त्या पोस्टच्या लेखकानुसार भारताला ऑगस्ट मध्ये स्वातंत्र्य मिळणार हे या सर्वांना आधीपासूनच ठाऊक होते कि काय ? असा प्रश्न पडतो.
खरेतर इंडिया शब्दाची व्युत्पत्ती ही " इंडस रिव्हर सिव्हिलायजेशन " म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्यातील वसाहत ( संस्कृती ), यातून झालेली असावी असे वाटते. 
ऋग्वेदामध्ये ज्याला सप्त-सिंधू असे म्हटले आहे त्यालाच अवेस्ता मध्ये हप्त-हिंदू असे संबोधले गेले. तसेच संस्कृत मध्ये काही ठिकाणी स चे ह झालेलेही आढळते. त्यामुळे इंडस (सिंधू) वरून इंडिया आणि  सिंधुस्थान वरून  हिंदुस्थान अशी या शब्दांची व्युत्पत्ती आहे.

राहता राहिला प्रश्न इंडिया हे नाव सावरकरांनी सुचवले आहे का ? जर स्वातंत्र्या नंतर या राष्ट्राचे नाव काय ठेवायचे असे विचारले असते तर सावरकरांनी " हिंदुस्थान " असेच नाव सुचवले असते.

त्यामुळे हिंदू समाजाचा या राष्ट्राच्या नावाशीही संबंध न ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या पोस्टला कोणीही बळी पडू नये अशी नम्र विनंती.

आपलाच :
श्रीपाद श्रीकांत रामदासी 
 धायरी पुणे ४१.

Comments