स्वदेशीला राजाश्रय हवाच !

 

[दै. प्रभात (पुणे शहर आवृत्ती) १७-१०-२०२०]

नमस्कार !

आज दै. प्रभात (पुणे शहर आवृत्ती ) मधील,  चीन मधून ए. सी. आयात करण्यावर बंदी घालण्याच्या, केंद्र सरकारच्या निर्णया संदर्भातली बातमी वाचली. 

केंद्र सरकारने देशी उत्पादनांना प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे असेही समजले. 

हा निर्णय वाचून, एका शिवकालीन ऐतिहासिक संदर्भाची आठवण झाली. 

१६७१ साली, कोकण किनारपट्टीवर बारदेशातून आणलेले मीठ विकले जात असे. ते मीठ देशी मिठागरातील मिठापेक्षा स्वस्त असल्याने, त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असे. पर्यायाने देशी मीठ तसेच पडून राहून देशी व्यापाऱ्यांचे नुकसान होत असे. 

हि बाब महाराजांना समजताच, त्यांनी आपल्या कुडाळच्या सरसुभेदारांस बारदेशातून येणाऱ्या मिठावर जबर जकात बसवण्याची आज्ञा केली. 

महाराजांनी स्पष्टपणे लिहिले की; ही जकात इतकी जबर असावी की काही झाले तरी बारदेशचे मीठ हे देशी मिठापेक्षा खूपच महाग झाले पाहिजे. महाराज लिहितात ;

 " ..... बारदेशात मीठ विकते, त्याने कितेक जबर पडते, ते मनास आणून त्या अजमासें जकात जबर बैसवणे की संगमेश्वरी विकतें आणि घाटपावेतो जे बेरीज पडेल त्या हिशेबी बारदेशीचे मिठास जबर जकात घेवणे. संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे.  जरी जबर जकातीचा तह नेदा, मुलाहिजा कराल, म्हणजे कुल उदमी खळक बारदेशाकडे वोहडेल. आपली कुल बंदरे पडतील. ऐसी गोष्टी आहे. ....... "

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ (राजवाडे) मधील पत्रे-यादी लेख क्र. २७ मध्ये हे पत्र उपलब्ध करून दिले आहे. 

यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की; स्वदेशी व्यापार, उत्पादन वाढवताना त्यांना असणारी परदेशी मालाची स्पर्धा कमी करण्याकरता प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणेने देखील व्यापारी, उत्पादक यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.

केवळ आयतीद्वारे मिळणाऱ्या सरकारी लाभापेक्षा, स्वदेशी उत्पादनाला अधिक महत्व देणे हे देखील राष्ट्रीय उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक आहे. 

केंद्र सरकाराच्या या निर्णयाने, स्वदेशी उत्पादकांना लाभ होईल अशी अपेक्षा आहे.

एकंदरीत काय स्वदेशी उत्पादनांना राजाश्रय हा हवाच !


: श्रीपाद श्रीकांत रामदासी.


Comments